पुणे : ‘मधुमेहावर नियंत्रणासाठी काटेकोर शिस्त महत्त्वाची असून, त्यामुळेच पुढची गुंतागुंत टळू शकेल,’असे मत एस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील कन्सल्टंट डायबेटोलॉजिस्ट डॉ. आदित्य बारी यांनी व्यक्त केले.
‘एकीकडे भारत मधुमेहाची राजधानी होत आहे,तर दुसरीकडे हाच मधुमेह पुढच्या अनेक गुंतागुंत आणि रोगांना आमंत्रण देऊ शकतो. मधुमेह हा झपाट्याने वाढत असून, त्यावर नियंत्रण न ठेवल्यास गुंतागुंत निर्माण होऊ शकते. मधुमेहामुळे अगदी मेंदूपासून ते पायापर्यंत सर्वांवर प्रभाव पडू शकतो. त्यामध्ये मेंदूचे विकार, स्ट्रोक, डोळ्यांचे विकार, मूत्रपिंड, लैंगिक समस्या, पायाच्या समस्या (फूट अॅम्पूटेशन,फूट अल्सर्स) निर्माण होऊ शकतात. मधुमेह नियंत्रणासाठी काटेकोर शिस्त गरजेची आहे. योग्य आहार, व्यायाम, पुरेशी झोप, वजन नियंत्रणात ठेवणे व सांगितल्याप्रमाणे नियमित डॉक्टरांची भेट घेऊन याचा आढावा घेणे गरजेचे आहे. मधुमेह हा फक्त साखर नियंत्रित ठेवण्याइतपत मर्यादित नसून तो अनेक रोगांसाठी जोखमीचा घटक आहे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. तरूणांमध्ये झपाट्याने मधुमेहाचे वाढत असलेले प्रमाण चिंतेची बाब असून, त्यांनी पुढील गुंतागुंत टाळण्यासाठी योग्य वेळी आपली जीवनशैली सुधारावी’, असेही डॉ. आदित्य बारी यांनी सांगितले.